Sunday, 1 July 2018

सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड

 सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड -

                  पूर्वी फारसा कुणाला माहिती नसणारा व दुर्गम डोगरात मुख्य गावांपासून काहीसा एका कोपऱ्यात असणारा हा धबधबा आता मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीपासून सप्टेंबर पर्यंत पर्यटकांनी गजबजलेला असतो . वेल्हे तालुक्यात नैऋत्य दिशेला डोंगरांतल्या एका टोकाला केळद नावाचे एक छोटेसे खेडे आहे ; तिथून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा घाटावरून सरळ खाली कोकणात कोसळतो . येणाऱ्या पब्लिकपैकी कित्येकजण हे अमराठी असतात त्यांना याच्या नावाबद्दल कुतूहल असण्याचे तसे काही कारणच नाही मात्र कित्येक मराठी लोकांनासुद्धा याला मढे घाट का म्हणतात हेसुद्धा ठाऊक नसते . 



              पुरंदरच्या तहात मुघलांकडे गेलेल्या , व पुण्यापासून नजरेच्या टप्प्यात असणाऱ्या कोंढाण्यावरचे मुघलांचे हिरवे निशाण महाराजांच्या डोळ्यात खुपत होते . हातात असलेल्या स्वराज्याच्या भूभागात मधोमध असलेल्या कोंढाण्याचे स्थान सामरिकदृष्ट्या महत्वाचे होते . स्वतःच्या मुलाच्या लग्नाआधी कोंढाणा स्वराज्यात परत घेऊ असा महाराजांना शब्द देऊन १६७० च्या मार्च महिन्यात सुभेदार तानाजी मालुसरे निवडक मावळ्यांबरोबर सिंहगडावर चालून गेले . गडावर झालेल्या तुंबळ लढाईत कामगिरी फत्ते करताना सिंहाचा वाटा उचलणारे मराठ्यांचे सुभेदार धारातीर्थी पडले व कोंढाणा किल्ला नरवीर तानाजींच्या स्मरणार्थ सिहंगड म्हणून ओळखला जाऊ लागला . 
             देव देश अन धर्मासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या व स्वराज्याच्या शुभकार्यासमोर आपले कौटुंबिक शुभकार्य गौण समजणाऱ्या आपल्या सुभेदाराची अंतिमयात्रा त्यांच्या कोकणातील उमरेठ गावात सन्मानाने निघावी यासाठी तानाजींचा देह सिहंगड ते उमरेठ लवकरात लवकर पोहचावा म्हणून महाराजांनी विशेष व्यवस्था केली होती . गुंजण मावळातील गुंजवणी, भट्टी, वरोती मार्गानं त्यांचा देह उमरेठला नेण्यात आला. दुर्गम सह्यगिरीतून जाणारा हा मार्ग तसा दुष्करच. म्हणायला फक्त घाट पण प्रत्यक्षात घाटावरून खाली कोकणात उतरायला एकावेळी एकच माणूस जाऊ शकेल अशी छोटीशी वाट . धबधब्याच्या जवळून झाडीतून उतरणाऱ्या ज्या अरुंद वाटेने तानाजींचा मृतदेह नेण्यात आला त्या घाटवजा पाऊलवाटेलाच पुढं मढेघाट असं नाव पडलं.

          काही वर्षांपूर्वी बाईकवर 2 वेळा जाऊन आलो असल्याने तिकडच्या अत्यंत तीव्र चढ- उतारांची कल्पना होती .पुण्यातून सायकलवर निघावं - आधी सिहगडाच्या पायथ्याला जाऊन या वाटेनं निघावं , त्यानंतर डोंगराळ भागात घुसून  मढेघाट उतरून मग उमरेठ गाठावं आणि या प्रवासात सुभेदार तानाजींच्या  पराक्रमाची उजळणी करावी असं बरीच वर्ष डोक्यात होतं पण योग जुळत नव्हता. 
        अखेरीस काल म्हणजे ३० जून २०१८ रोजी तो योग जुळून आला . रात्री ठरविल्याप्रमाणे  शनिवारी सकाळी सनी आणि मी निघायचे ठरवले होते .सकाळी उठून त्याला फोन लावतोय तर उचलताच नव्हता . साहेब 🐎🐎 विकून झोपले असल्यामुळे फोन उचलत नसतील असे समजून शेवटी सन्याची वाट बघून पावणे सातच्या आसपास घरून एकटाच निघालो . हमखास वाटेत भेटणारे आमच्या धर हॅण्डल मार पायडल संघटनेचे   सक्रिय कार्यकर्ते निलेश भाऊ धायरीच्या आसपास भेटले . सुट्टीच्या दिवशी ऑफीसला कामं निपटवण्यासाठी निघाले  होते 😛 त्यांचं गाव पाबे घाटाच्या आसपास असल्याने त्या भागातल्या दोन चार महत्वाच्या गोष्टी सांगून त्यांनी निरोप घेतला .
             सातारा हायवेला सायकलने नेहमीच चकरा होतात म्हणून नसरापूर वरून न जाण्याचे ठरवले होते . वेल्ह्याला जाण्यासाठी पाबे घाटापेक्षा पानशेत वरून जाताना कमी चढ लागतो असं निलेशनी सांगितलं होतं . मी सुद्धा  पानशेतवरून त्या रस्त्यानी पूर्वी कधी गेलो नसल्याने त्यानिमित्ताने नवीन काहीतरी बघायला मिळेल या हेतूने तिकडून जाण्याचे ठरवले .त्याप्रमाणे पानशेतचा रस्ता पकडून जात असताना आधी सिहंगड पायथ्याला काही क्षण थांबून गडाचे रौद्र रूप डोळ्यांत साठवून घेतले व गडावर असलेल्या सुभेदारांच्या स्मृतिस्थळावर असलेला त्यांचा अर्धाकृती पुतळा डोळ्यांसमोर आणून मनोमन प्रणाम केला .  जरा पुढे गेल्यावर  खानापूर नंतर पाबे घाटाला जायचा रस्ता दिसला व अंगातला elevation चा किडा वळववळला . बऱ्याच वर्षांत पाबे घाटात सायकल चढवली नसल्याने पानशेतवरून जायचा बेत ऐनवेळी फाट्यावर मारून पाबे घाटातूनच जाण्याचे ठरवले व फाट्यावरून डावीकडचा रास्ता पकडला .
                 पाबे घाट म्हणजे पुण्यातल्या तमाम सायकलिस्ट लोकांसाठी पर्वणी . अत्यंत तीव्र चढ उतार असणारा व अनेक नागमोडी वळणं असणाऱ्या या घाटात डबलसीट चढताना १०० - १२५ cc च्या मोटारबाईक्स सुद्धा फाफलतात . सायकलवरून पुण्यातून निघून वाटेतले चढउतार पार करत पाबे घाट एका दमात मारणं म्हणचे  एकप्रकारची परीक्षाच असते . माझी परीक्षा आता सुरु झालेली ... पण ती चढामुळे नव्हे तर बरेच दिवस सर्व्हिसिंग न केलेली सायकल घेऊन आल्यामुळे . सायकलचा पहिला गिअरच काही केल्या पडत नव्हता . एरवी पुण्याच्या आसपास कधी पहिला गिअर टाकायची गरजच पडत नसल्यामुळे इतक्यात तो वापरलाच गेला नव्हता . त्यामुळे नाईलाजाने २-१ वर उभे राहून जोर देऊन सायकल चढवाववी लागली . वाटेत एकाठिकाणी फार सुंदर वळण लागतं तिथे फोटो काढण्यासाठी थांबलो . 



          फोटोत फक्त घाटदार वळण दिसत असले तरी प्रत्यक्षात तिथे भयंकर चढण आहे ज्याची मजा घ्यायची असेल तर सायकल घेऊन स्वतः अनुभव घेणेच उत्तम . आसपास विशेष वर्दळ नसणारा पाबे घाटाचा परिसर हिरवाईने नखशिखांत नटलेला दिसत होता . वरून दिसणारी शेतं हिरव्या रंगात किती वेगवेगळ्या छटा असू शकतात याची प्रचिती देत होती . खालून मोरांचे मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होते .आजूबाजूला पाखरांचा किलबिलाट सुरु होता . घरापासून सुमारे ४० मिलीमीटर चढाच्या रस्त्याने घेऊन सुद्धा थकवा जाणवत नव्हता . घाटमाथ्यावर पोचेपर्यंत शरीर गरम झाले होते .  पुढच्या डोंगराळ रस्त्यासाठी वॉर्म अप झाला होता .  

            घाटमाथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण परिसर काही क्षण न्याहाळून लगेच घाट उतरायला सुरुवात केली . पुढचा उतार उतरताना सायकलचा दुसरा व अत्यंत महत्वाचा  प्रॉब्लेम समजला .... डिस्कब्रेक्स खूपच कमी लागत होते , त्यामुळे दोन्ही ब्रेक्स करकचून दाबूनच शक्य तितक्या हळू घाट उतरलो . खरंतर माझाच मूर्खपणा होता . तुम्ही कितीही अनुभवी सायकलिस्ट  असलात तरीही दरवेळी काहीतरी नवीन गाढवपणा करत असता व त्यातून शिकत असता . गेल्या महिन्यातच मी माझी MTB upgrade केली . २६ इंच चाकं असलेली जुनी MTB विकून दुसरी २९ इंची चाकांची व डिस्क ब्रेक्स असलेली SCOTT ची ASPECT 950 घेतलेली .  डिस्क ब्रेक्स लूज आहेत हे माहिती असून पण सगळीकडे तशीच दामटत होतो . आतापर्यंत चालून गेलं तसं या राईड ला पण चालून जाईल , नंतर परत आल्यावर करू सर्व्हिसिंग असं काहीस डोक्यात घेऊन मी घरून निघालो होतो .आज पाबे घाटाच्या उताराने मात्र माझ्या सायकलच्या ब्रेक्सची व माझ्या ब्रेक्सबाबतच्या समजुतीची पार वाट लावलेली होती. 


           पुढे पाबे गावातून जाऊन वेल्ह्याच्या रस्त्याला लागलो  व सुमारे १०.:३० च्या आसपास वेल्ह्यात नाश्त्याला थांबलो . वेल्ह्यातील मटण थाळीसाठी  प्रसिद्ध असलेले हॉटेल स्वप्नील यांनी त्यांची खास बिर्याणीसाठी दुसरी शाखा गावातच उघडली आहे .घाट मारून भूक लागली असल्याने माझी बिर्याणी खायची तयारी होती मात्र इतक्या सकाळी बिर्याणी तयार नसल्याने मला अंडा भुर्जीवर ताव मारावा लागला . चवदार अंडा भुर्जी व वहिनींच्या (हॉटेल मॅनेजरच्या मिसेस) हातच्या गरम गरम घरच्यासारख्या चपात्या खाऊन तृप्त झालो . तितक्यात बाहेर लहान लहान पोर जमून गडबड करताना दिसली . हॉटेल च्या मॅनेजरच्या पाचवीतल्या मुलाची सायकल रात्री जवळच्या वाडीतल्या कुणीतरी चोरून नेलेली , ती गावातल्याच त्याच्या दोस्तांनी शोधून परत आणलेली . ती त्याला द्यायला म्हणून गॅंग जमली होती . एकीकडे आपल्या पराक्रमाचे  रसभरीत वर्णन करताना सोबतच त्याच्या सायकलची बाहेरच लावलेल्या माझ्या सायकलबरोबर तुलना सुरु होती . पोरांबरोबर फोटो काढून पुढच्या प्रवासाला निघालो . 


         थोडासा चढ चढून पुढे गेल्यावर गुंजवणे धरणाची भिंत व जलाशय लागतो . अजून त्या भागात जोरदार पाऊस झाला नसल्याने जलाशय पूर्णपणे भरलेला नव्हता तरीसुद्धा ढगाळ  वातावरणात जलाशयाच्या कडेकडेने जाताना प्रसन्न वाटत होतं . 
जरा पुढे गेल्यावर तोरणा किल्ल्याची मागची बाजू दिसली . पुणे जिल्ह्यातील सर्वेच्च ठिकाण असणारे तोरणा किल्ल्याचे टोक ढगात होते . एक फोटो घेऊन पुढे निघालो .  



          पुढच्या रस्त्यावर पुष्कळशी बांबूची झाडं लागतात व दाट झाडीसुद्धा सुरु होते . २-३ चढ चढल्यावर एक घाट लागतो . सरळसोट चढ चढल्यानंतर ३-४ वळणं घेत रास्ता एका डोंगरावर घेऊन जातो . सायकलवर हा घाट चढताना खरा कस लागतो . एखाद्याला चढाईचा पुरेसा अनुभव नसेल तर तो हा घाट चढणं केवळ अशक्यच .वर गेल्यानंतर डावीकडे परत एकदा तोरणा किल्ल्याचा बुधला माचीकडचा भाग दिसतो . 



        काही वर्षांपूर्वी इकडे जंगल आणि मोजकी खेडी पाडे सोडलं तर काही म्हणजे काहीही नव्हतं . आता मात्र २-३ रिसॉर्ट आणि ४-५ चहा भज्यांच्या टपऱ्या झालेल्या दिसल्या . या डोंगरावरून जाणारा रस्ता आणि वरून दिसणारे दृश्य दोन्हीही खूप सुंदर . रस्त्यावरून जाताना दोन्ही  बाजूंनी डोंगराच्या कडा दिसतात . अरुंद असलेल्या या डोंगराच्या आजूबाजूला जर ढग उतरले असले तर आपण ढगातून जात असल्याचा भास होतो . 

      नंतर तीव्र उतार सुरु होतो  जो खालच्या पाड्यात घेऊन जातो .. ह्या उतारावर दोन्ही ब्रेक्स संपले होते  . २ ठिकाणी उतारावर पाय घासत कसेबसे वळणावरून खाली पडता पडता वाचलो. आपल्या सायकल चे दोन्हो ब्रेक्स एकदम वारले असून या डोंगराळ भागात आपण अशीच सायकल दामटवली तर आपले पण दिवस भरतील हे लक्षात आलं .आता फार शहाणपणा न करता सरळ परतीची वाट पकडावी असे मनात आले . सायकल कॉम्पुटरमधे बघितल्यावर लक्षात आले की मढेघाट अजून फक्त ९ किलोमीटर आहे . आपण बऱ्याच वर्षांनी सायकल घेऊन इकडे इतक्या दूरवर आलोय ,आत्ताच माघार घेण्यापेक्षा ज्याकरता आलोय तिथे जाऊनच मग परत फिरू , मात्र यापुढे जाताना व परत जाताना प्रत्येक उतारावर सायकल हातात घेऊन चालत उतरावे लागेल असा विचार केला व पुढचा रस्ता पकडला .           
            थोडंसं पुढे गेल्यावर एक ओढा लागला . त्या ओढ्याच्या पुलावर २०१२ साली बाईकवर आलो होतो तेव्हा एका सरड्याच्या फोटो काढलेला . आत्ताही उगाचच नजर त्याठिकाणी कुणी सरडा वगैरे दिसतोय का हे शोधात होती . आपल्या खुळेपणावर  हसत ओढा पार करून पुढे निघालो.


२०१२ मधे काढलेला फोटो 
           पुढचा केळद घाट लागण्यापूर्वी भाताची  हिरवीगार शेतं लागली. त्यांचा हिरवागार रंग डोळ्यांमधून थेट मनापर्यंत जात होता . घाट सुरूहोण्यापूर्वी व शरीर परत एकदा गरम होण्यापूर्वी आतून थंडावा मिळाला . 





             केळद घाट सुद्धा आधीच्या दोन्ही घाटांइतकाच घाणेरडी चढण असलेला . ग्रेडियंट १२-१३ च्या पुढेच . घाट सुरु होताना पाऊस सुरु झाला . तापलेल्या रस्त्यावर पावसाचे थेंब पडताच वाफा निघायला लागल्या . त्या वाफांमधून वारं चढताना मजा वाटत होती . वर खिंडीत पोचल्यावर पुढे उतार लागला . मी गप सायकल हातात घेऊन उतरणं सुरु केलं . थोडं खाली उतरल्यानंतर खराब रस्ता लागतो . त्यावरून सरळ पुढे गेलं की केळद गाव लागतं . इथूनच मढेघाट धबधब्याला जायचा रस्ता लागतो . हल्ली गावकऱ्यांनी आलेल्या गेलेल्यांची नावे , वाहनांचा क्रमांक वगैरे नोंदवून घेणे सुरु केले आहे . त्याचप्रमाणे माणसी १० रुपये उपद्रव शुल्क पण आकारण्यास सुरुवात झाली आहे .  




      इथून धबधब्यापर्यंत कच्चा रस्ता आहे .माझ्याकडे MTB असल्याने मी थेट धबधब्यापर्यंत सायकलवर जाऊ शकलो . ओढ्याला पाणी कमी होतं आणि दाट ढग असल्यामुळे काहीही दिसत नव्हतं . धबधबा दिसेल का नाही याचा विचार करत मी पलीकडच्या कड्यावर गेलो . दुसरीकडून धबधब्याचा आवाज तर येत होता . जरावेळात ढग विरळ जाळे आणि पलीकडे कड्यावरून कोसळणारा पांढराशुभ्र धबधबा नजरेस पडला . १० मिनिटांत सगळे ढग दूर होऊन लक्ख सूर्यप्रकाश पडला आणि धबधबा स्पष्ट दिसायला लागला . खाली कोकणात उतरणारी वाट सुद्धा दिसायला लागली . खाली दूर असलेली गावं, शेतं, झाडी वगैरे सगळं स्पष्ठत दिसायला लागलं . दूरवर दिसणारे सह्याद्रीचे कडे , त्यांचे विविध रांगडे आकार , वर कापूस पिंजून ठेवल्यासारखे वेगवेगळ्या छटा असलेले ढग , आजूबाजूचे जंगल व साथीला धबधब्याचा धीरगंभीर आवाज . सगळं काही स्वर्गीय .



सह्याद्रीतला हा स्वर्गीय भूभाग खरंतर नशिबवानच म्हणायचा . तात्कालीन भारताचा मोठा प्रदेश मुघली अंमलाखाली असताना या प्रदेशाला शिवरायांच्या स्वराज्यातला प्रदेश होण्याचे भाग्य मिळाले . तसेच त्या स्वराज्यासाठी जीवाचे मोल देणाऱ्या वीरांचे अंतिम दर्शन घेण्याचे सुद्धा भाग्य मिळाले . 



त्या वातावरणात रमलो असताना " आपल्या सायकल चे ब्रेक्स संपले आहेत ...जाताना सगळे उतार पायी उतरायचे आहेत , परत जायला वेळ लागणार आहे . तेव्हा हे स्वर्गसुख घेत न बसता आता परत निघावे" असा विचार करून मी परतीच्या वाटेवर निघालो .परत येताना केळद घाटाची चढाई धाडून खिंडीत आल्यावर हा बोर्ड दिसला . 

       लगेच सायकलवरून खाली उतरलो व सायकल हातात घेऊन उतार उतरायला लागलो . इकडचे उतार खरोखरच भयंकर आहेत  याची जाणीव ब्रेक्स नसतानाच होते . 




          खाली उतरून जरा पुढे जातोय तोवर मगाशी उतरलेला घाट व त्याआधीचा उतार आता चढण्यासाठी सज्ज होता . जास्त विचार न करता खाली मान घालून चढायला सुरुवात केली . आधी वळणं चढून झाली , मग सरळ चढ चालून झाला  मग येताना लागलेला मँगो रिसॉर्ट लागला , परत एकदा चढ , त्यानंतर आता सरळ रस्ता लागेल असं वाटतंय तोवर परत एकदा चढ ...असं सुमारे ४० मिनिट चढून चढून दम निघाला तरीही सपाट रस्ता येण्याची चिंन्हे दिसेनात . त्यात ढग दाटून आल्यामुळे अंधारून आलेलं , पावसाला सुरुवात झालेली . आणखी ५ मिनिटं चढल्यानंतर जरा सपाट रस्ता लागला . भयंकर भूक लागलेली व प्रचंड थकवा पण जाणवत होता . जरा पुढे गेल्यावर एक टपरी लागली . तिथे खायला थांबलो . तोपर्यंत मुसळधार पाऊस सुरु झालेला . मी डोंगर माथ्यावर असल्याने वारं पण प्रचंड होतं . सोबत आणलेला रेनकोट अंगावर चढवून गरम गरम आम्लेट पाव आणि चहा घेतला . जरावेळ विश्रांती घेऊन पाऊस कमी होण्याची वाट बघत बसलो . ५० मिनिटं टाईमपास करून सुद्धा पाऊस थांबण्याचे नाव घेत नव्हता . आणखी एक चहा घेतल्यामुळे तरतरी जाणवत होती . साडेचार वाजून गेले होते . अंधार पडायच्या आत किमान नसरापूर तरी गाठावं म्हणून पावसातच निघालो . थोडं पुढे गेल्यानंतर मोठा घाट उतार लागला जो शिस्तीत हात सायकल घेऊन मी चालत पार केला .           

त्यानंतर सायकलवर टांग मारून सरळ वेल्हे गाठलं . वाटेतले उतार सरळ रस्ता असल्यामुळे व्यवस्थित पार पडले ..खाली उतरायची गरज पडली नाही . आम्ही सायकलिस्ट जमातीमधले लोक केवळ उतारावरून व वळणांवरून सुसाट गिरक्या घेत खाली येत यावं म्हणून मोठेमोठे घाट जीवाला त्रास करून घेत चढतो . आज मात्र नेमकी उलटी परिस्थिती होती . आज चढ आल्यावर बरं वाटत होतं  तर उतार आल्यावर भीती . 😰 💀आता आणखी उतार नकोत म्हणून परत पाबे घाटात न जाता नसरापूर मार्गे जाण्याचे ठरवले . वेल्हे - ते नसरापूर हे ३१ किलोमीटरचे अंतर अंधार पडायच्या आत पार करायचे म्हणून सुसाट सायकल ठोकली . आता दम काढणारे चढही नव्हते व भीतीदायक उतार सुद्धा नव्हते . २५ kmph चा ऍव्हरेज स्पीड पकडून ७:१५ च्या सुमारास मी नसरापूर पार करून संपूर्ण काळोख व्हायच्या आत सातारा हायवेला लागलो होतो . परत एकदा चहा - भेळ खाऊन ताजेतवाने होऊन सायकल चे दिवे सुरु केले व खेड - शिवापूर , कात्रज नवीन बोगदा पार करत रात्री ९:३० च्या सुमारास घर गाठले . 

strava वर डेटा सिंक करून बघितल्यावर आपण आज तब्बल २७०६ मीटर ची चढाई करताना १६० किलोमीटर सायकल चालवल्याचे लक्षात आले . स्वराज्यनिमितीत योगदान असणाऱ्या एका वीराच्या आठवणीत व निसर्गाच्या सानिध्यात संपूर्ण दिवस गेला याचे समाधान वाटले . सायकल च्या ब्रेक्समुळे मात्र ही राईड कायम लक्षात राहील . 



--- ©Advait Khatavkar

Tuesday, 2 January 2018

डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचा ओरसेंड पूल - अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल

डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचा ओरेसंड  पूल - अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल

             २०१५ च्या जून महिन्यात कामानिमित्त्य स्वीडनला जाण्याचा योग आला .तिथला मुक्काम तीनच आठवडे असल्यामुळे सपत्निक जाण्याचे ठरविले.  स्वीडन म्हणजे जगातल्या संपन्न , समृद्ध आणि शांत देशांपैकी एक . उत्तर ध्रुवाजवळ असलेल्या या स्कॅंडेनेवियन देशात गेल्यावर डोळ्याचे पारणे फेडणारी अनेक ठिकाणं आपल्याला बघायला मिळणार याची खात्री होती.

             आधी मुंबई ते पॅरिस आणि नंतर पॅरिस ते कोपनहेगन असा विमान प्रवास करून आम्ही कोपनहेगन विमानतळावर  पोचल्यानंतर डेन्मार्क व स्वीडन यांच्यामधल्या ८ किलोमीटर  समुद्रावर पूल बांधून बनविलेल्या व सुमारे ४ किलोमीटर समुद्राखालून भुयार बनवून बांधलेल्या ओरेसंड मार्गावरून मेट्रो पकडून स्वीडनच्या माल्मो शहरात दाखल झालो . जगातल्या प्रमुख आंतरराष्ट्रीय पूलांपैकी असणाऱ्या - डेन्मार्क व स्वीडन दरम्यानच्या ओरेसंड सामुद्रधुनी वर असलेल्या या पूलाबद्ल आधीपासूनच बरेच कुतूहल होते .त्याबद्दल थोडक्यात माहिती  करून देण्याचा हा प्रयत्न .

                 
               या दोन देशांना पुलाद्यारे जोडण्याची योजना तशी फार जुनी म्हणजे १९३६ सालातली . त्याकाळच्या काही नामवंत बांधकाम कंपन्यांनी त्यावेळी सरकारकडे अशाप्रकारचा महाकाय समुद्री पूल बांधण्याची योजना मंडळी होती . पण दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती योजना पारच बारगाळली गेली . पुढे अनेकदा या ना त्या कारणाने हा मुद्दा स्वीडन व डेन्मार्क या देशांच्या सरकारांमध्ये चर्चेत येत राहिला .. १९७३ साली या प्रश्नाने उचल देखील खाल्लेली परंतु सादर देशांपुढील आर्थिक परिस्थितीमुळे पुन्हा १९७८ साली हि योजना रद्द करावी लागली . कालांतराने हळूहळू गोष्टी सकारात्मक होत गेल्या व १९९५ साली सुरु झालेले हे महाकाय बांधकाम सुमारे पाच वर्षांनी पूर्ण होऊन १ जून २००० साली हा पूल व भुयारी मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला .


डेन्मार्क व स्वीडन दरम्यानचे छोटेसे बेट व बेटापासून डेन्मार्क च्या मुख्य भूमीशी जोडल्या गेलेला पूल . या बेटापासून स्वीडनपर्यंतचा मार्ग समुद्राखालून बनवलेल्या भुयारातून जातो .

 २००० साली बांधून पूर्ण झालेला हा मार्ग अभियांत्रिकी व वास्तुस्थापत्य क्षेत्रातील एक कमाल म्हणता येईल . दोन देशांच्या मधोमध असणाऱ्या एका छोट्याश्या बेटाचा आधार घेऊन हा मार्ग बनविण्यात आला .डेन्मार्क मधील कोपनहेगन ते या बेटापर्यंत केबल वापरून बनवलेला पूल अगदी आपल्या वांद्रे-वरळी सी लिंक सारखाच दिसतो . या बेटापासून स्वीडनच्या माल्मो शहरापर्यंतचा मार्ग पूर्णतः भुयारी असून समुद्राच्या खाली असणाऱ्या भूभागातून तो जातो .अवाढव्य पूल व समुद्राखालचे भुयार या दोन्ही गोष्टी बनवताना अंदाजे २.६ बिलियन युरो म्हणजे सुमारे २० हजार करोड रुपये इतका खर्च आला . याशिवाय तो बनवायला लागलेली प्रचंड मेहनत , पुलाच्या मधले भाग बसवायला लागलेल्या तरंगत्या राक्षसी क्रेन्स , भुयार खोदण्यासाठी लागलेले अद्यावत तंत्र व मोठमोठया मशिन्स हे सगळंच अद्भुत होतं . बांधकाम होतं असतानाचे व्हिडीओ यू ट्यूबवर  उपलब्ध आहेत .


वरील सर्व छायाचित्रे साभार - इंटरनेट 


                 आजघडीला स्वीडन व डेन्मार्क या शेजारीज देशातील वाहतूक अत्यंत सोपी व जलद होऊ शकली ती या अचाट बांधकामामुळेच .यावरून एकाचवेळी खालून रेल्वे व वरून मोटार गाड्या जाऊ शकतील अश्या प्रकारची व्यवस्था असणाऱ्या या मार्गावरून हजारो लोकं दररोज ये जा करत असतात. अर्थात यासाठी वाहनचालकांना टोल सुद्धा मजबूत भरायला लागतो . पुलाची उंची मुद्दामून जास्त म्हणजे २०४ मीटर ठेवण्यात आलेली आहे जेणेकरून मोठमोठी जहाजं पुलाच्या खालून सहज जाऊ शकतील .

पुलावरून कोपेनहेगनला जात असताना रेल्वेतून काढलेला फोटो  

 या पुलावरून दिवस उजेडी जाताना , खास करून रेल्वेतून जात असताना खूप भन्नाट वाटतं . खिडकीतून दोन्ही बाजूंना अथांग समुद्र दिसत असतो व आपण त्यावरून तरंगत जातोय असा भास होतो . पुलाच्या आजूबाजूंना असलेल्या पवनचक्क्या व दोन्ही बाजूंना लांबवर दिसणारे डेन्मार्क व स्वीडन देशांचे किनारे तुमची सफर आणखीनच प्रेक्षणीय बनवतात . कधी यूरोपात डेन्मार्कला व स्वीडनला जाण्याच्या योग आला तर माल्मो ते कोपनहेगन हा प्रवासाची मजा या पूलावरून आवर्जून घ्यावी .

--- ©Advait Khatavkar

Tuesday, 26 December 2017

200 मीटर ते 200 किलोमीटर - माझे कॉलेज पर्यंतचे सायकलींग चे किस्से

200 मीटर ते 200 किलोमीटर - माझे कॉलेज पर्यंतचे सायकलींग चे किस्से


काही गोष्टी तुमच्या आयुष्यात तुमच्या ध्यानीमनी नसताना नकळत येतात  , पुढे त्या गोष्टी हळूहळू आवडू लागतात -त्याची गोडी वाढू लागते . त्या गोष्टींबद्दल विस्मयकारक / अद्भुत घटना घडतात  त्या गोष्टीचा छंद जडतो  व कालांतराने तुमच्या आयुष्याचा भाग बनून जातात .सायकल आणि सायकलिंग बाबत माझ्या आयुष्यात काहीसं असंच झालंय.

माझ्या आयुष्यात सायकल नेमकी कधी आली ते मला स्वतःला आठवत सुद्धा नाही . काहीही न कळण्याच्या वयात माझ्यासाठी आई बाबांनी  तीन चाकी सायकल आणलेली .  २७-२८  वर्षांपूर्वीचे जुने फोटो बघितल्यावर काही फोटोंमध्ये मी तीनचाकी सायकलवर बसलेलो दिसतोय .आम्ही पुण्याजवळ देलवडीला होतो  त्यावेळी त्या सायकलसकट एकदा जिन्यावरून खाली गडगडत आल्याचे पुसटसं आठवतं .

                       देलवडीला असतानाचा माझ्या पहिल्या सायकल बरोबरचा फोटो . वय वर्ष ३-४ .

वयाच्या साधारण तिसऱ्या वर्षी म्हणजे चड्डी घालायची अक्कल नव्हती त्याकाळी एक लाल रंगाची सायकल माझ्याकडे होती. ती सायकल पुढे काही वर्ष मी चालवत असलो पाहिजे कारण सावंतवाडीला बालवाडीत असताना एका सायकल स्पर्धेत पोडियम मारल्याचे मला चांगलेच आठवतेय . त्या रेसचा फोटो बघून तर काही आठवणी ताज्या होतात . स्पर्धेच्या आधी कमरेच्या खाली एक गळू  ( Boil ) झालेलं होतं बहुदा आईने त्याला ड्रेसिंग करून दिलेलं .बसायला काय चड्डी घालायलासुद्धा त्रास होतं होता .आणि अश्यातच तीन चाकी सायकलच्या स्पर्धेत उतरलेलो. माझी सायकल डबलसीट वाली होती , नीटसं आठवत नाही पण बहुदा वजन नको म्हणून मागची सीट काढून ठेवली असणार किंवा मी तोडून टाकली असणार . स्पर्धेच्या दिवशी सकाळी सावंतवाडीच्या मुख्य बाजारात श्रीकृष्ण कोल्ड्रिंक हाऊस ते काणेकरांच्या लाकडी खेळण्याच्या दुकानाच्या मधल्या भागात स्पर्धकांसाठी चुन्याने लेन बनवल्या होत्या ( लहानपणी बालवाडी -पहिली -दुसरी अशी तीनच वर्ष सावंतवाडीत होतो पण जवळजवळ सगळे रस्ते व ठराविक ठिकाणं अजूनही  डोक्यात फिट्ट बसलेले आहेत त्यामुळे आजही त्या घटना रस्ते व जागांसकट आठवतात ) प्रत्येक स्पर्धकाने आपापल्या लेन मधून सायकल चालवायची होती . मला रस्त्याच्या सर्वात उजवीकडची अगदी नालीच्या शेजारजी लेन दिलेली होती ..शेजारीच नाली असल्याने आपण सायकल पळवण्याच्या नादात त्यात पडू की काय अशी भीती त्यावेळी वाटल्याचे मला अजूनही चांगलंच आठवतंय . नशिबाने माझ्या शेजारचा स्पर्धक नव्हता आला , त्यामुळे मला शेवटून दुसऱ्या लेन मध्ये ठेवण्यात आले . नक्की अंतर माहिती नाही पण अंदाजे २०० मीटरची ती छोट्या मुलांसाठीची सायकल स्पर्धा होती .
आयुष्यातल्या पहिल्यावहिल्या सायकल स्पर्धेत मी (चट्ट्यापट्ट्याचा टीशर्ट) आणि  माझा सगळ्यात जुना मित्र हर्षल  (लाल शर्ट) आपापल्या सायकली हाणताना  

स्पर्धा सुरु झाल्यानंतर तिसऱ्या का चौथ्या मिनिटाला मी अंतिम रेषेच्या पलीकडे होतो . माझा मित्र हर्षल कुलकर्णी त्याची आकाशी रंगाची सायकल हाणत माझ्यापेक्षा काही सेकंद आधी पोचला होता .व माझा दुसरा नंबर आलेला . ती माझ्या आयुष्यातली पहिलीवहिली सायकल रेस . गळू ठणकत असताना पूर्ण केलेली . नंतर चड्डी खाली घसरत असताना पोलीस काकांकडून घेतलेले दुसऱ्या नंबरचे बक्षीस सुद्धा चांगले आठवतेय . (नशीब फोटो काही सेकंद आधी घेतला गेलाय 😁 ) .
                           पोलीस काकांकडून दुसऱ्या नंबरचे बक्षीस घेताना पोडियम फिनिशर मी 😁

          मी दुसरीत असताना आम्ही सावंतवाडी सोडली  त्यानंतर ती सायकल कुठे गेली ते आता आठवत नाही . पुसदला आल्यावर गजानन मंदिराच्या समोर राहायला असताना शेजारचे व शाळेतले असे खूप जण मित्र मैत्रिणी म्हणून  मिळाले . त्यापैकी काही जण आमच्यापेक्षा वयानी ३-४ वर्षांनी मोठे सुद्धा होते . त्यातले काही जण भाड्याच्या सायकली तासाने चालवायला आणायचे . सायकलवाल्याकडे काही माध्यम आकाराच्या व काही लहान सायकली होत्या . त्यांना बघितल्यावर आपणही सायकल चालवावी असे वाटायचे पण दोनचाकी सायकल येत नव्हती .दोन- चार वेळा आईकडून ५० पैसे घेऊन छोटी सायकल शिकायला म्हणून आणली . शेजारची रिता ताई आणि एक दोन मोठे मित्र मागे धरून चालवायला शिकवायचे . कधी कधी त्यांच्या मोठ्या सायकलवरपण त्यांच्या मदतीने शिकण्याचा प्रयत्न करून झाला पण सायकल काही स्वतःची स्वतः सुटी चालवता येत नव्हती . हे सगळं करताना बरेचदा कोपरं गुढघे फोडून पण घेतलेले .

                   एकदा मात्र एक विलक्षण घटना घडली ... रात्री झोपेत एक स्वप्न पडलं .. स्वप्नात मी सायकल चालवायला शिकत होतो , रिता ताईने अचानक माझी सायकल सोडून दिलेली आणि मी त्याची पर्वा न करता न धडपडता स्वतः ची स्वतः व्यवस्थित सायकल चालवत होतो ... मी सायकल चालवायला शिकलो होतो . जाग आली तेव्हा दरदरून घाम फुटला होता , आपण ग्राउंडवर सायकल चालवतोय का घरात झोपलो आहे ते कळेना . आजूबाजूला बघितल्यावर ते स्वप्न होतं याची खात्री पटली पण मनात चलबिचल होताच होती .  ते फक्त एक स्वप्न होतं का कसली अनुभूती होती हे कळायचं वय नव्हतं पण काहीतरी नेहमीपेक्षा वेगळं होत असल्याची जाणीव होत होती . दुसऱ्या दिवशी बहुदा सुट्टीचा दिवस होता . सकाळी सकाळी आईकडून पैसे घेऊन एकट्याने सायकलवल्याचे दुकान गाठले व एक छोटी सायकल घेतली . रात्रीच्या स्वप्नाने एक जबरदस्त आत्मविश्वास दिलेला. ते स्वप्न होतं हे पूर्णपणे माहिती असूनसुद्धा आपण काहीतरी केलं तर तोंडावर आपटू अशी अजिबात भीती वाटली नाही . एकट्यानेच सायकलवर टांग मारली व चालवायला सुरुवात केली ...सायकल पुढे जायला लागली व हळूहळू तोल सांभाळत मी ती काळजीपूर्वक रस्त्यावर चालवायला लागलो . काय गम्मत झालेली काय माहिती पण अश्याप्रकारे अक्षरशः एका रात्रीतून मी अचानक सायकल चालवायला शिकलो होतो . म्हटलं तर चमत्कार , म्हटलं तर मानसशास्त्र किंवा आणखी काही . कदाचित आधीचे काही दिवस सायकल शिकण्यासाठी केलेले प्रयत्न व इतर मोठ्या मित्र-मत्रिणींनी केलेली मदत ही तोफेत भरलेला दारुगोळा होता व त्या स्वप्नानी त्याला बत्ती देण्याचे काम केले असावे . त्या दिवशी घरून आणखी पैसे घेऊन पुढचे काही तास मी पुसदच्या शंकर नगर व मोती नगरच्या रस्त्यांवर सायकल फिरवत होतो . एखाद्या पक्षाच्या पिल्लाने पडत पडत अचानक उडणे  शिकल्यानंतर उंच भरारी घेतल्यानंतर त्याला जसं वाटत असेल अगदी तीच अवस्था माझी झालेली होती. घरच्यांना आणि मित्र मैत्रीणींना पण असं अचानक काय झालं याचं आश्चर्य वाटत असणार .

                  यानंतर अनेकदा भाड्याची सायकल घेऊन जवळपास फिरणं व्हायचं . पाचवीला गेल्यावर आई-बाबांनी ऍटलासची सायकल घेऊन दिलेली. रोज शाळेत त्यावरच जाणे होई . एकदा त्या सायकलवर केलेला स्टंट व्यवस्थित आठवतो  ...  पाचवीला होतो .नुकतीच सायकल घेतली होती . एका रविवारी एकटाच सायकलवर बोंबलत  फिरत असताना आसेगावकर शाळेशेजारचं उंच टेकाड दिसलं . आधी बरेचदा त्या टेकाडावर खेळायला म्हणून आम्ही जात असू  . त्यावर सायकल चढवून नेली तर खाली जोरात येताना काय मज्जा येईल ---असं म्हणून त्यावर सायकल हातात घेऊन चढवली बऱ्यापैकी तीव्र चढ असल्यामुळे धापा टाकत कसंबसं वर पोचलो. त्या टेकाडावर जायला खरंतर रास्ता अथवा पायवाट अशी नव्हतीच , सगळा मामला ओबडधोबडच होता . खाली येण्यापूर्वी त्यातल्यात्यात बरा पट्टा बघितला .तिथे काही बकऱ्या चरत होत्या . वरून सायकल येत असताना त्या बाजूला होतील असा विचार करून मी सायकलवर बसलो व सायकलसकट स्वतःला उतारावर सोडून दिलं . भयंकर वेगाने येणारी सायकल आणि त्यावर बसून ओरडत खाली येणाऱ्या मला बघूनसुद्धा ती बकरी काही ढिम्म हालली नाही .त्या वेगात सायकल नियंत्रणात आणणं अथवा दिशा बदलणं अशक्य होतं . मी त्याच वेगात सरळ त्या बकरीला जाऊन ठोकलो .. सायकल सकट मी हवेत गिरकी घेतलेली मला आठवतेय ..... आणि त्यानंतर दाणकन आपटल्याचा आवाज उडालेली धूळ आणि ओरडणारी बकरी एव्हढाच आठवतंय .काय झालंय हे कळायला व आपण जिवंत आहोत हे समजायला काही सेकंद लागले . दुपारची वेळ असल्यानं जवळपास कुणीही नव्हतं . आपल्याला नेमकं कुठेकुठे लागलंय  - सायकलचं काय काय तुटलंय - ती बकरी जिवंत आहे का ? हे सगळं याचं क्रमाने तपासलं . मुरमाड जमिनीवर वेगाने घासल्या गेल्यामुळे मला बऱ्यापैकी लागलेलं होतं ...सायकल साधी असल्याने सायकलचे काही नट निघालेले . बकरीसुद्धा जिवंत होती व पलीकडे जाऊन चरत होती .मळालेल्या कपड्यांनी , खरचटलेल्या अंगानी व तुटलेली सायकल हातात घेऊन तडक घरी गेलेलो . हा माझ्या आयुष्यातल्या पहिलाच  डाऊनहीलिंग सायकलींगचा अनुभव - आयुष्यभर लक्षात राहणारा .  त्यानंतर बरेचदा MTB  वर डाऊनहीलिंग केलं पण इतकं बेक्कार कधीही  आपटलो नाही .

           नववीला असताना हिरोची डेव्हिल मिळाली . ती चंदेरी रंगाची दणकट असलेली MTB सायकल मला जाम आवडायची . त्यावर पुसद व पुसदच्या आजूबाजूला खूप फिरल्याचे आठवतंय . आमचे पुसदचे घर जरा गावाच्या एका टोकाला होतं . तिथून बाहेरगावी जाण्यासाठी ३ वेगवेगळे रस्ते होते . कधी कार्ला रस्त्याने छोटासा घाट चालून वर तर कधी सांडवा -मांडवा रस्त्याने डोंगराळ भागात दूर इसापूर धरणापर्यंत पर्यंत एकट्यानेच जाणं होतं असे . दहावीला असताना पुसदला एक 25 किलोमीटरची छोटीशी सायकल रेस झालेली त्यात खुल्या गटात भाग घेऊन रेसिंगचा थरार अनुभवलेला . अकरावी बारावीला असताना ३५-४० किलोमीटर केल्यानंतर सायकलिंगची वेगळीच मजा अनुभवायला शिकलो .या दरम्यान दिग्रसला जाताना लागणार घाट , खंडाळा घाट  , पूस धरण अश्या अनेक राइड्स कधी मित्रांबरोबर तर कधी एकट्याने झाल्या .एकदा मातोश्रींबरोबर इसापूर धरणावर सायकलवर गेलेलो .मातोश्रींनी त्या वयात डोंगराळ भाग बिना गियरच्या लोखंडी सायकलवर कडक उन्हात चढून कमाल केलेली .

           एकदा काही मित्रांना घेऊन जंगल सफारीसाठी सायकलवर खंडाळ्याच्या जंगलात बरेच पुढे गेलेलो ( हा विदर्भातला पुसद जवळचा खंडाळ्याचा घाट बरं का )  .जाताना रस्तावर नीलगाय दिसलेली तर जंगलात थोडं आतमध्ये रानडुकरांची टोळी दिसलेली . पार वाशीम जिल्याची सीमा ओलांडूनच परत आलेलो आम्ही त्यावेळी .

                    अशीच एक खंडाळ्याची रपेट चांगलीच लक्षात राहण्याजोगी - अकरावीला असताना लेक्चर बुडवून अमित आणि सुमित या अतरंगी -अवकाळी  मित्रांबरोबर सायकलवर खंडाळ्याचा घाट गाठला . सायकली रस्त्यावर लावून आम्ही बरेच आतमध्ये जंगलात फिरायला म्हणून गेलो . मागच्या बाजूला खाली दिसणारं एक सुंदर तळे बघून परत येत होतो . पानगळीचा ऋतू असल्याने व संपूर्ण जंगल सागवानाची असल्याने जंगलातल्या झाडांची सुमारे ८० टक्के पाने वळून खाली पडलेली होती . ती पाने  तुडवत चालताना कचर कचर आवाज होत होता .. काहीठिकाणी तर पाय गुडघ्यापर्यंत आत पानांमध्ये जात होता . अश्यात अम्याला काय दुर्बुद्धी सुचली काय माहित - लेकाने सोबत आणलेली काड्यापेटी काढली व एक वाळलेलं पान दिलं पेटवून ...ठणठणीत वाळलेलं कोरडं जंगल ते ...आम्ही तिथून निसटायच्या आत आमच्या समोरच धडाधडा आग पेटली . सागवानाची असंख्य वाळलेली पाने डोळ्यादेखत धडाधडा पेटलेली बघून आम्ही रस्त्याकडे पळत सुटलो . रस्त्यापर्यंत येईतोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते व रस्त्यालगतच्या वाळलेल्या पानांपर्यंत ती आग येऊन पोहोचली होती . आम्ही पटापट सायकली काढल्या व टांग टाकून पुसदच्या दिशेने सुसाट सुटलो . आपण भयंकर मोठा आगावपणा केला आहे याची सगळ्यांना खात्री पटलेली . आग जरावेळात शांत होईल याची खात्री होती - तरीही कुणासमोर या गोष्टीची वाच्यता करायची नाही असे ठरवलेले . जरा पुढे येताच घाटात आमच्याच दिशेने वर येणारी पोलिसांची जीप दिसल्यावर मात्र फाटायचीच बाकी राहिलेली . तरीपण थोडं डोकं वापरून विचार केला की पोलिसांचा हा  नेहमीच राउंड असणार ते वर येईपर्यंत आपण त्यांना पार करून खाली पोचलेले असू . फक्त कुणी त्यांना पास होताना जंगल - आग - पेटवलं वगैरे शब्द उच्चरायचे नाहीत असं ठरवून आम्ही काही घडलंच नाही अश्या आवेशात गपचूप पुसदला येऊन पोचलो . पुढे बरीच वर्ष तो किस्सा आठवून दात काढत होतो . पण परत असलं काही धतींग करून जंगलांना व जंगलात राहणाऱ्या जीवांना हानी पोचवायची नाही असा निश्चय केला .            
                सध्या The Kayakers या ग्रुपनी  पुणेकरांसाठी  Pedal to Kayak  हा जबरदस्त उपक्रम आयोजित केलेला आहे . पुण्यातून सायकलवर गेलात तर मोफत कयाकिंग करायला शिकवतात . आम्ही २००४ साली Pedal to Kayak  अचानक कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय केलेलं . एकदा कॉलेजला असताना कौतुकला घेऊन पुसदपासून सुमारे २८ km  वर असणारं पूस धरण सायकलवर गाठलं . पावसाळ्याचे दिवस सुरु होते व धारण तुडुंब भरलेलं होतं . धरणाच्या पाण्यात थर्माकोल टाकून एक स्थानिक मासेमार झिंगे पकडत होता . नेमका आम्ही तिथे काठावर गेलो असतानाच तो जेवायला म्हणून बाहेर आलेला . तो जेवेपर्यंत त्याचं ते थर्माकोल घेऊन आम्ही आळीपाळीने पाण्यात उतरलो . दोन्ही बाजूने पाय पाण्यात टाकून स्वतःच तोल सावरत हातातल्या दांडक्याने ते वाळवत खोल पाण्यात बऱ्याच आतमध्ये जाऊन आलो . जाताना जराजरा गडबड झाली तरी आपण पाण्यात पडू शकतो हे माहिती होतं . सुदैवानी वारा नसल्यामुळे आम्हीओ दोघेही एत्या जुगाडू कयाक वर  बसून कयाकिंग करून आलो . परत आल्यानंतर यथावकाश  फोटो आले . फोटो बघितल्यावर भलते साहस केल्याबद्दल मातोश्रींकडून  भरपूर बोलणी पण  खाल्लेली .

 आयुष्यातला पहिला वाहिला Pedal to Kayak चा अनुभव . 

मी आणि कौतुक तुडुंब भरलेल्या पूस धरणाजवळ . साल २००४ 

      सायकल ही गोष्ट पाचवीपासून जी अत्यावश्यक झाली ती त्यानंतर नेहमीसाठीच . अकरावीत असताना आईनी पुण्यातून हिरोची Hawk सायकल घेऊन दिली . स्टील बॉडी असलेली बिनागिअरची ती सायकल माझी पहिली रोड बाईक .

                अकरावी बारावी ते पुढे MCA  होईपर्यंत ती सायकल रगडून वापरली . पुसदला असताना सांडवा मांडवा च्या रस्त्यानी कधी उमरखेड रस्त्याने टेकड्या चढत सायकलने जास्तीत जास्त लांब जाण्यात मजा वाटायला लागलेली होती . पुढे २००६ साली पुणे - बारामती  या अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित सायकल स्पर्धेत " Indian Cycle  Without  Gears  " या गटात भाग घेऊन सायकल रेसिंगचा थरार अनुभवला होता . १३८ km  चे अंतर वेगात पार करून बारामतीला पोचेपर्यंत अक्षरशः वाट लागलेली. त्यात अनेक राष्ट्रीय सायकलपटूंना बघून व त्यांच्या लै भारी सायकली बघून खूप इंप्रेस झालो होतो . कमवायला लागल्यानंतर स्वकमाईतून चांगली रेसिंग सायकल घ्यायची हे तेव्हाच ठरवले होते . रेस पूर्ण करून लगेच दुसऱ्याच दिवशी पुसदसाठी बस पकडलेली . सायकल बसच्या डिकीत ठेवली होती . प्रचंड थकलो असल्याने सकाळी पुसद कधी येऊन गेलं ते कळलंच नाही . डोळा उघडेपर्यंत सुमारे ७५ km पुढे दारव्हा जवळच्या बोरी-अरब पर्यंत जाऊन पोचलो होतो . मग परत हॅन्डबॅग पाठीवर अडकवून सायकलवर केलेला बोरी -एरव्ही ते दारव्हा असा १० km चा  प्रवास - त्यानंतर सिमेंट नेणाऱ्या ट्रकमधून दिग्रस पर्यंत मिळालेली लिफ्ट व परत दिग्रस ते पुसद असा ३० किलोमीटर सायकलवरची रपेट ही पुणे -बारामती रेस इतकीच थरारक होती . दिग्रस वरून पुसदला येताना एका मित्राला-  चिक्याला मी सायकलवर हॅन्डबॅग पाठीवर अडकवून येताना दिसलो तेव्हा त्याचे उघडे पडलेले तोंड व बाहेर आलेले डोळे अजूनही लक्षात आहेत . 

     शिकायला MCA  साठी पुण्यात आल्यानंतर सायकलिंग ला भरपूर वाव मिळाला . रोज कॉलेज -क्लास वगैरे साठी सायकल वापल्यामुळे भरपूर सायकलिंग होई व वेगवेगळे रस्ते सुद्धा माहिती होत असत . पुढे जॉब ला लागल्यावर २०१२  साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ही माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल . त्यावर लांब लांब भटकून झाल्यानंतर व पहिली 200 km ची BRM केल्यानंतर २०१६ ला Cannondale  ची रोड बाईक घेतली . त्यावर आता BRM राइड्स व रेसेस जोरात सुरु आहेत . 

 २०१२  साली life cycle कडून घेतलेली Bergamont ची MTB ,माझी स्वकमाईतून घेतलेली पहिली सायकल .

        २०१६ ला घेतलेली  Cannondale ची रोड बाईक

Monday, 11 December 2017

वाढलेले साहसी पर्यटन आणि डोंगरदऱ्यांचे पावित्र्य

वाढलेले साहसी पर्यटन आणि डोंगरदऱ्यांचे पावित्र्य

                             गेल्या काही वर्षांत आपल्या भारतात वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे आणि यापुढे दर वर्षी ते वाढतच जाणार यात तिळमात्र शंका नाही. त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या रोजगाराच्या दृष्टीने व  सदर राज्याच्या आर्थिक बळकटीच्या दृष्टीने नक्कीच चांगली गोष्ट आहे . त्याशिवाय जास्तीत जास्त लोकं यानिमित्ताने आपल्या देशातले विविध भूप्रदेश ,लोकसंस्कृती , खाद्यसंस्कृती , लोककला अनुभवतायत  व वातावरण , भाषा , जैवविविधता यातले वेगळेपण अनुभवतायत याचाही आनंदच आहे .


                 गेल्या वर्ष  ४-५ वर्षांत महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरताना पर्यटनात झालेली लक्षणीय वाढ मी स्वतः अनुभवली आहे .साहसी पर्यटन सुद्धा याला अपवाद नाही . यापूर्वी देवस्थानं ,तीर्थक्षेत्र व थंड हवेची काही प्रसिद्ध  ठिकाणं सोडली तर इतर कित्येक ठिकाणी अत्यंत तुरळक मंडळी दिसायची .गड किल्ल्यांच्या बाबतीत  सांगायचं तर जिथे थेट वरपर्यंत गाड्या जाऊ शकतात वा रोप वे आहे असे काही बोटांवर मोजण्यासारखे सिहंगड ,प्रतापगड ,पन्हाळा ,रायगड सारखे किल्ले सोडले तर बाकी ठिकाणी जास्त करून ,गिरीप्रेमी -दुर्गप्रेमी मंडळी व ट्रेकर लोकंच दिसायची .आता मात्र गेल्या २ वर्षांत जवळजवळ सगळ्याच गड किल्ल्यांवर गर्दी वाढलेली दिसली .राजमाची ,कलावंतीण -प्रबळगड ,पेठ चा किल्ला ,विसापूर अश्या हमरस्त्यापासून जवळच असणाऱ्या किल्ल्यांवर गेल्या २ वर्षांत वीकेंड्सला अक्षरशः जत्रा भरलेली  दिसली . कात्रज ते सिहंगड , राजगड ते तोरणा असे मोठे ट्रेक्स गेल्या १० वर्षांत मी कैक वेळा केले आहेत . पण २०१६ -१७ मध्ये जितकी गर्दी मला या दोन्ही ट्रेकला दिसली तेव्हढी लोकं गेल्या ९ वर्षांमध्ये मिळून सुद्धा नाही दिसली . अधारबन ,देवकुंड धबधबा , भीमाशंकरच्या जंगलातील वाटा अश्या जागा आत्तापर्यंत हाडाचे ट्रेकर्स व आमच्यासारखे काही उनाड भटके यांच्याव्यतिरिक्त विशेष कुणाला माहिती नव्हत्या व अश्या ठिकाणांवर सुद्धा बरेच ग्रुप्स आलेले दिसतात .पूर्वी अश्या आडवाटेच्या ठिकाणांवर तुमच्या व तुमच्या ग्रुपशिवाय कुणीही दिसत नव्हते. पिण्याचे पाणी ,अन्नपदार्थ वगैरे सगळं स्वतःला पाठीवर वागवावे लागायचं . आता यांपैकी बऱ्याच ठिकाणी पाणी बाटल्या , नाश्ता-जेवण वगैरे सहजासहजी मिळतं .

                काही ठिकाणी अचानक  वाढलेल्या पर्यटनाला आपले बॉलिवूडचे चित्रपट आणि सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणावर जवाबदार आहे असं माझं निरीक्षण आहे . 'थ्री इडियट्स'मधे दाखवल्या गेल्यानंतर पँगॉंग लेक जबरदस्त लोकप्रिय झालं .आजच्या घडीला  तिथे एकावेळी हजारो लोकं राहू शकतील अशी व्यवस्था केली गेली आहे . सिनेमात दाखवलेली तो पिवळी स्कुटरपण तिथे पर्यटकांसाठी आणून ठेवलीय म्हणे . ' ये जवानी है दिवानी' मधे दाखवल्या हिमालयीन ट्रेक नंतर हिमालयात ट्रेकसाठी जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले .  मनालीजवळच्या बंजारा कॅम्प , गुलाबा, रोहतांग पास, हमटा पास याठिकाणी झुंबड उडू लागली . " चेन्नई एक्सप्रेस' मधे दाखवलेला दूधसागर धबधबा बघून अनेकांनी पावसाळ्यात तिकडे गर्दी करणे पसंत केले . तर व्हाट्सअँप वरून फिरणारे कलावंतीण , सांदण दरी , देवकुंड धबधबा यांच्या व्हिडीओ क्लिप्स बघून तरुणाईची पावलं अश्या दुर्गम ठिकाणी पडू लागली .

               देशातली तरुणाई सह्याद्रीच्या - हिमालयाच्या कानाकोपऱ्यात जातेय , तिथली नवनवीन ठिकाणं शोधून काढतेय , तिथलं रौद्र रूप जवळून अनुभवतेय, कधी कडक ऊन  कधी बोचरा थंड वारा तर कधी आडवातिडवा कोसळणारा पाऊस दिवसभर तंगडतोड करत वा बाईक-सायकल चालवत अंगावर घ्यायला  शिकतेय , तिथलं अप्रतिम सौंदर्य आपल्या मोबाईलमध्ये-कॅमेऱ्यांमध्ये एका वेगळ्या स्तरावर जाऊन साठवतेय हे सगळं एका दृष्टीने नक्कीच सुखावह आहे .

               आज हे सगळं लिहिण्याचा हेतू 'पर्यटन वाढले' हे सांगण्याचा नसून ' पर्यटनाबरोबर बेशिस्तपणा - घाण -कचरा करण्याचे प्रमाण व इतर सर्वप्रकारचाच आचरटपणा कमालीचा वाढलेला आहे ' हा आहे .

 सह्याद्रीच्या डोंगरांवर साठत जाणारा कचरा      
             
गेल्या ४-५ वर्षांत सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यात प्लास्टिक व कागदाचा हा कचरा अवाढव्य प्रमाणात वाढलेला दिसतोय . जे फक्त मौज मजा करायला सह्याद्रीत वा हिमालयात जातात त्यांना तो दिसणारसुद्धा नाही पण पर्यावरणाची , गड किल्ल्यांची विशेष काळजी घेणाऱ्या गिरीप्रेमी लोकांना व गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी दुर्ग स्वच्छतेसाठी राबणाऱ्या दुर्गप्रेमींचे साफसफाई मोहिमांचे त्यांनी गोळा केलेला कचऱ्याचे फोटो बघितले तर कदाचित माझं म्हणणं पटेल .

Let's recognize our heroes चे शिलेदार विक्रांत सिंग आणि सहकारी देवकुंड धबदब्याच्या मार्गावरून कचरा गोळा करून आणताना .

बा रायगड परिवाराचे अमर सोपनर आणि सहकारी किल्ल्यावरच्या दारूच्या बाटल्या आणि इतर कचरा गोळा करताना साभार : अमर सोपनर यांची फेसबुक वॉल

          तीच कहाणी हिमालयाची .गेल्या ऑगस्ट महिन्यात हिमालयात सायकलिंगला जाऊन आलो. तिथे हिमालयाच्या दुर्गम भागात पण भरपूर पर्यटन वाढल्याचे दिसले . मनाली- लेह- खारदूंगला या १० दिवसांच्या सायकल मोहिमेत असताना  देश विदेशातून आलेले असंख्य बायकर्स दिसले. बुलेटवाल्या लोकांचा तर अक्षरशः सुळसुळाट होता . त्यांच्याशिवाय वेगवेगळ्या आकारांच्या चारचाकींमधून आलेलं पब्लिक पण भरपूर होतं . जून ते सप्टेंबर हा हिमालयात फिरण्यासाठी उत्तम काळ . गर्दी ही असणारच . तरीसुद्धा वाटेवरचे स्थानिक दुकानदार , गाववाली लोकं यांच्याकडे चौकशी केल्यानंतर गेल्या  ४-५ वर्षांमध्ये पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे समजले .

         पर्यटन वाढले ही आनंदाचीच गोष्ट . परंतु येणारं बहुसंख्य पब्लिक हे सुशिक्षित असलं तरीही  सुसंस्कृत अजिबात नाहीये याची खात्री मनाली -लेह महामार्गावर हजारोंनी पडलेल्या पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या , वेफर्स- बिस्किटांची  वेष्टनं , रेडबुल , फ्रुटी , ट्रॉपिकाना पिऊन रस्तावरच टाकलेले कॅन्स , बियरचा फोडलेल्या बाटल्या इत्यादी कचरा बघून पटली .वाटेत लागणाऱ्या निळ्याशार सुंदर हिमालयीन तळ्यामध्ये पण काही मूर्खांनी टाकलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या बघितल्या . सायकलवर हिमालयातले घाट चढताना अक्षरशः इंच न इंच रस्ता तुमच्या डोळ्याखालून जात असतो .त्यावेळी पावलोपावली पडलेला असा कचरा बघून ही असली भिकारड्या मानसिकतेची लोकं डोक्यात जायला लागतात. दररोज शक्य तीथे सायकल थांबवून असे पडलेले कॅन्स ,बाटल्या उचलून माझ्या बॅगमधे घेण्याचे व कँम्पिंगला थांबू त्यावेळी आमच्या गाडीत ठेवण्याचे काम व त्यावेळी तो कचरा करणाऱ्याला मनापासून शिव्या घालण्याचे काम सुद्धा सुरूच होते ......

                                              पाँग च्या घाटात पडलेले रेडबुल चे कॅन 

   हिमनक ही बॉर्डर रोड अर्गनायझेशन ची हिमालयात रस्ते बनवणारी एक विलक्षण टीम . त्यांनी लिहिलेल्या या लक्ष वेधून घेणाऱ्या बोर्डावरच काही सडक्या मेंदूच्या हरामखोरांनी बिअरची बाटली फोडलेली दिसली . 


             आपण राहतो त्या ठिकाणांवर म्हणजे आपल्या शहरांमध्ये , गावांमध्ये आधीच आपण भयंकर कचरा करून ठेवलेलेच आहे . आता सह्याद्रीच्या , हिमालयाच्या पर्वतरांगा आपण घाण करायला लागलो आहोत .हे सगळं वेळीच थांबले नाही तर आणखी १०-१५ वर्षातच परिस्थिती भयावह  झालेली असणार यात शंका नाही .
 
                      स्वच्छता राखण्यासाठी मुद्दाम केले गेलेले संस्कार आणि लहानपणापासून लावलेली शिस्त हे दोन घटक तर महत्त्वाचे आहेतच पण याव्यतिरिक्त ज्याप्रकारे चित्रपट व सोशल मीडिया ही माध्यमं पर्यटन वाढण्यास कारणीभूत ठरली त्याचप्रमाणे त्याच माध्यमांचा उपयोग जनजागृतीसाठी प्रभावीपणे केला जाऊ शकतो .  नुकताच दुर्गसंवर्धन या विषयावर असलेला " बघतोस काय मुजरा कर" या नावाचा  एक मराठी चित्रपट येऊन गेला . भारतीय लोकांवर चित्रपटांचा प्रचंड प्रभाव असतो हे जगजाहीर आहे . एखाद-दुसऱ्या हिंदी चित्रपटात  आमिर / रणबीर अथवा गेलाबाजार सलमान खान लोकांना पर्यटनाला डोंगर दऱ्यांमध्ये गेल्यावर कचरा करू नका वगैरे डोस देताना दिसला अथवा रणवीर - दीपिका एखाद्या बुलेटवरून हिमालयात फिरताना लोकांनी टाकलेला कचरा आपल्या बॅगमधे उचलून टाकताना व त्यासोबत काही खरमरीत डायलॉग बोलताना दिसले तर आपल्या कॉपीकॅट सुशिक्षित अडाणी प्रेक्षकांवर थोडाफार प्रभाव नक्कीच पडू शकतो . ज्या वेगाने आपण सांदण दरीचे - देवकुंड धबधब्याचे , कलावंतिणीचा सुळक्याचे ड्रोन कॅमेऱ्यातून घेतलेले HD व्हिडीओ व्हाट्सअँपवर , फेसबुकवर शेअर करतो त्याप्रमाणेच थोडे प्रबोधनात्मक , गड किल्ले साफ करतानाचे , हिमालयातील सुंदर नितळ तलावांमधून प्लास्टिक बाहेर काढतानाचे HD व्हिडीओ पण शेअर करायला सुरु करू . कुठेही ट्रेक ला जाताना एखादी मोठी पिशवी अथवा पोते आपल्या ग्रुपचा कचरा टाकायला व त्याठिकाणी पडलेला कचरा उचलून आणायला सोबत घेऊ शकतो .



           आज ११ डिसेंबर , जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने खालील ३ गोष्टी करण्याचा निश्चय करूया .

१. निसर्गात असताना स्वतःकडून कुठल्याही प्रकारचा अनैसर्गिक कचरा होणार नाही  याची दक्षता घ्यायची.
२. इतरांना कचरा करण्यापासून रोखायचे 
३. इतरांनी केलेला कचरा शक्य तेव्हा शक्य होईल तसा गोळा करून योग्य जागी त्याची विल्हेवाट लावायची . त्यासाठी कुठलीही लाज बाळगायची नाही .

--- ©अद्वैत पराग खटावकर

Wednesday, 6 December 2017

द डेक्कन क्लीफहँगर



                                    द डेक्कन क्लीफहँगर

गेल्या ४ आणि ५ नोव्हेंबर २०१७ रोजी द डेक्कन क्लीफहँगर ही ६४३ किलोमीटरची वार्षिक अल्ट्रा सायकल रेस जल्लोषात पार पडली .बऱ्याच दिवसापासून डेक्कन क्लीफहँगर या स्पर्धेबद्दल विस्ताराने लिहायचे होते . स्पर्धेबद्दलच्या पोस्ट्स टाकल्यानंतर बरीच लोकं इनबॉक्समध्ये येऊन " भाऊ DC म्हणजे काय ? " असं विचारात होती . त्यापैकी काही लोक नियमितपणे सायकलिंग सुद्धा करतात . यंदा स्पर्धेचे पाचवे वर्ष होते . वर्षागणिक स्पर्धेतील सहभाग प्रचंड वाढत असला तरीही जास्तीत जास्त लोकांना स्पर्धेबद्दल माहिती व्हावी , त्यातील स्पर्धकांच्या वर्षानुवर्षे केलेल्या मेहनतीबद्दल आणि नवनवीन विक्रमांबद्दल माहिती व्हावी यासाठी हा प्रपंच .


डेक्कन क्लीफहँगर काय असतं हे जाणून घेण्या अगोदर आपण Inspire India आणि RAAM बद्दल थोडीशी माहिती घेऊ .

भारतीय सायकलपटूंना जागतिक स्तरावरच्या सायकल स्पर्धांमध्ये जाण्याची संधी मिळावी , सहभाग वाढावा , व त्यांना जागतिक स्तरावरील नावाजलेल्या सायकलिस्ट लोकांमध्ये राहून शिकण्याची , स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळावी याकरिता Inspire India संघटना काम करते . जागतिक स्तरावरच्या सायकल स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी आधी Qualifier स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध करावं लागत , अश्या Qualifier Races भारतामध्ये आयोजित करण्याचे काम व त्याकरिता आवश्यक ते सगळे काही Inspire India करते . Divya Tateमॅडम या Inspire इंडिया च्या सर्वेसर्वा व उत्तम सायकलिस्ट असून त्यांनी आत्तापर्यंत कैक सायकलपटूंना मार्गदर्शन केले आहे . त्यांच्याबद्दल लिहायचे झाल्यास एक वेगळा लेख लिहावा लागेल . तूर्तास google करून माहिती घ्यावी . हे झालं Inspire इंडिया बद्दल थोडक्यात . 

आता ज्यासाठी हा सगळं अट्टाहास त्या RAAM म्हणजेच Race Across America या जगातील सर्वांत खडतर सायकल स्पर्धांपैकी एक असलेल्या स्पर्धेबद्दल थोडक्यात माहिती घेऊ .

अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यापासून सुरु होऊन पूर्वेकडील किनाऱ्यावर संपणारी , १२ राज्यातून जाताना तब्बल ३००० मैल म्हणजेच ४८२८ किलोमीटर अंतर व सुमारे १७०००० फूट म्हणजेच सुमारे ५१८०० मीटर चा एकूण चढ चढत उतरत जाणारी , वाटेत लागणाऱ्या अतिउष्ण व अतिशीत प्रदेशातून ऊन वारा पाऊस अंगावर घेत पूर्ण करायची रेस म्हणजे RAAM . वाचायला जेव्हढं भयंकर वाटतं त्याहून कितीतरी पट जास्त खडतर असणारी ही स्पर्धा solo वाल्यांना १२ दिवसाच्या आत तर टीम कॅटेगरी वाल्यांना ९ दिवसांच्या आत आपले खाणे-पिणे -झोपणे व इतर विधी रस्त्यांवरअथवा रस्त्यालगतच्या हॉटेल्स -कंट्रोल पॉईंट्स वर उरकत पूर्ण करायची असते . सोबतीला सपोर्ट कार व सपोर्ट टीम असते . ५१८०० m चा चढ म्हणजे एव्हरेस्ट सुमारे सहा वेळा चढण्याइतके होते . यावरून तुम्हाला स्पर्धेचा अदाज येईल .
तर अश्या या महाभयंकर स्पर्धेत सहभाग घ्यायचा असेल तर आधी स्वतःला एखाद्या भयंकर स्पर्धेत सिद्ध करून दाखवावे लागते . आणि ती भयंकर स्पर्धा म्हणजेच DC - द डेक्कन क्लीफहँगर . RAAM च्या आयोजकांनी नेमून दिलेल्या नियमांप्रमाणे या qualifier स्पर्धा होणे आवश्यक असते . RAAM qualifying साठी ४०० मैल म्हणजे सुमारे ६४३ किलोमीटर चे अंतर solo साठी ३२ तासांत पूर्ण करणे आवश्यक आहे . महिला स्पर्धकांसाठी आणि वेगवेगळ्या वयोगटांनासाठी हे वेळेचे बंधन वेगवेगळे आहे . तुम्हाला RAAM मध्ये कुठल्याही प्रकारात ( SOLO अथवा टीम ) भाग घ्यायचा असेल तरी RAAM qualifier ही solo गटातच पूर्ण करावी लागते .
नावाप्रमाणेच दक्खनच्या पठारावरून आणि डोंगरांच्या कड्यांवरून वळणं घेत ही स्पर्धा सह्याद्रीच्या रौद्र रूपाचे दर्शन घडवत शेवटी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर संपते . यंदा पुणे -पाचगणी - भिलार -सातारा -कोल्हापूर-धारवाड - गोवा ( बागमालो बीच ) असा स्पर्धेचा मार्ग होता . वाटेत ६ कंट्रोल पॉईंट्स होते जिथे एका ठराविक वेळेपूर्वी पोहचून रिपोर्ट करायचा असतो .
                                               डेक्कन क्लीफहँगर स्पर्धेचा २०१७ चा मार्ग  
फॉरेस्ट ट्रेल, भूगाव मधल्या द क्लीफ पासून सुरु झालेले स्पर्धक आधी कात्रज चा चढ चढून शिरवळपर्यंत मजेत येतात . खंबाटकी घाट घामाघूम होत चढत नंतर सूर्य ऐन डोक्यावर असताना पसरणी घाटात जोर काढताना दिसतात .
                         कात्रज घाट चढताना सपोर्ट कार्सची झालेली गर्दी . साभार - रेणुका कुलकर्णी 
पाचगणीला पोचल्यावर जरा दम खायला उसंत मिळते ना मिळते तेव्हढ्यात भिलारच्या आसपास चे तीव्र चढ उरलासुरला जीव काढतात .
                          भिलार नंतरचा एक तीव्र चढ चढताना मी - साभार : Inspire India Official  Photographer
 पण त्यानंतर वाटेत लागणारे स्ट्रॉबेरीचे मळे , डोंगर उतार व डोळ्याचे पारणे फेडणारा निसर्ग बघून थकलेल्या जीवाला जरा आराम मिळतो .मेढा येईपर्यंत थकवणारा चढ व जीवघेणी वळणं संपली असतात त्यामुळे जरा हायसे वाटायला लागते . पण त्यानंतर साताऱ्यापर्यंतचा व त्यापुढचा रस्ता कडक उन्हात उलटे वारे सुरु असताना मारायचा असल्याने त्यांना हायसे वाटून चालणार नसते . त्यातच त्यांच्या गटातील स्पर्धक पुढे जाताना दिसल्यावर तर परत अंगात संचारले जाते व पायडल जोरात मारली जातात ... घशाला सतत कोरड पडत असते , या आधी २-३ वेळा खाऊन सुद्धा पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात . सपोर्ट टीम मधली लोकं अश्यावेळी स्पर्धकांना खायला प्यायला घालून त्यांचा पुढचा टप्पा सुकर करत असतात .
             गेली तीन वर्ष सातत्याने आपल्या गटात अव्वल नंबर मिळवणारा अरहाम शेख व त्यांच्या टीमची सपोर्ट कार  

कोल्हापूर च्या आसपास येईपर्यंत सूर्य अस्ताला गेलेला असतो पण स्पर्धक आणि सहाय्यक यांचा उत्साह मात्र तसाच असतो . हवेतील गारवा वाढत असतो , दिवसभर वेगवेगळ्या प्रकारे सायकल मारून कंबर तुटायला आलेली असते , पायात गोळे यायला सुरुवात झालेली असते . सायकलचे व सपोर्ट कार्स चे मागचे लाईट्स सतत लुकलुकत असतात .......स्पर्धकांचे पायसुद्धा सतत पायडलवर फिरताना दिसतात व त्यांच्याबरोबर पायडल चे चमकणारे रेडियमही सतत वर खाली चमकताना दिसत असतं .
  रात्रीच्या वेळी सपोर्ट कारच्या प्रकाशझोतात मार्गस्थ होताना एक स्पर्धक . साभार : Inspire India Official  Photographer

जरी वेग मंदावला असला तरी हेच सातत्य आणखी काही तास सुरु ठेऊन आपल्याला स्पर्धा वेळेत पूर्ण करायची आहे ...थांबून चालणार नाही . असंच काहीसं प्रत्येकाच्या डोक्यात सुरु असतं . . तवंडीचा छोटासाच पण दमवणारा घाट चढून सगळे धारवाडकडे मार्गस्थ होतात . शेवटी कर्नाटक -गोवा सीमेवरील महावीर पक्षी अभयारण्यातील थंडगार हवा ,घनदाट जंगल व त्यातून वळसे घेत जाणारा अप्रतिम रस्ता थकलेल्या स्पर्धकांसाठी एक अल्हाददायय अनुभव असतो .असंख्य वेडीवाकडी वळणं असलेला अल्मोद घाट काळजीपूर्वक उतरून स्पर्धक गोव्याच्या लाल मातीत उतरतात . पुढचा चढ उताराचा रस्ता व हमखास कुणीही मार्ग चुकू शकेल असे २-३ महत्वाचे फाटे पार कारून सरतेशेवटी स्पर्धक बागमालो बीच वर येऊन पोचतात .फिनिश लाईन वर वेळ नोंदवून आयोजकांकडून फिनिशर्स मेडल मिळाल्यानंतर समोर पसरलेला अथांग समुद्र खारं वारं अंगावर घेत बघताना मिळणार आनंद अवर्णनीय असतो ......
          स्पर्धेचा शेवट जिथे होतो तो बागमालोचा समुद्रकिनारा . साभार - प्रितेश कुलकर्णी 

गेले कित्येक महिने रात्रंदिवस केलेल्या मेहेनतीने चीज झालेले असते .काही जणांनी नवीन विक्रम केलेले असतात .काही मोजके धुरंदर ३२ तासांच्या आत स्पर्धा पूर्ण करून RAAM साठी qualify झालेले असतात .भारतीय सायकल जगताला नवीन हिरो हिरोइन्स- नवीन रोल मॉडेल्स मिळालेले असतात .तर काही जण त्यांच्या आयुष्यातील सर्वांत अभिमानाचे क्षण साजरे करत असतात .
संध्याकाळी बीचवर होणाऱ्या बक्षीस समारंभात व Cliffhangover party मध्ये उत्साह ओसंडून वाहत असतो . विजेत्यांना स्टेजवर बोलावून त्यांचे कौतुक होत असताना होणारा जल्लोष काही औरच असतो .

यावर्षीच्या DC मधले किस्से , काही लै भारी स्पर्धकांबद्दल माहिती , RAAM मधल्या भारतीयांच्या सहभागाबद्दल व त्यांनी केलेल्या विक्रमांबद्दल व इतर गमतीजमती परत कधीतरी .

- अद्वैत खटावकर .

सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड

 सायकलवर पुणे ते मढेघाट : अविस्मरणीय राईड -                   पूर्वी फारसा कुणाला माहिती नसणारा व दुर्गम डोगरात मुख्य गावांपासून काहीसा...